Monday, 6 October 2025

तो, ती आणि मी..

    तशी 'त्या'ची आणि माझी ओळख अगदी लहानपणी ची. जसं कळायला लागलं तसा तो ही माहीत झाला.. घरात सगळ्यांना आवडायचा ना..

पण खरं सांगू आई बाबांनी लहानपणी साधी तोंडओळख पण करून नाही दिली त्याची मी 10 12 वर्षांची होई तो.. 

मग कधीतरी एखाद्या लग्न समारंभात.. किंवा सहलीमध्ये तो भेटायचा..

तशीच त्याची थोडीशी ओळख झालेली..

जरा मोठे झाल्यावर म्हणजे कॉलेजला गेल्यावर तो नियमित भेटायला लागला..

तो असला की मित्र मैत्रिणींच्या गप्पांना अजूनच रंगत यायची.. आहेच तो तसा.. नुसत्या येण्यानेच सगळं वातावरण उत्साही करून टाकणारा.. 

तेव्हा त्याच्या एका अगदी घनिष्ठ मैत्रिणीची पण ओळख झाली..

जसे राम सीता, राधा कृष्ण.. तसे तो आणि ती.. त्याचं नाव क्वचितच वेगवेगळं घेतलं जातं..

हा जसा सदाबहार.. सगळ्यांशी मैत्री करणारा.. सगळ्यांना आपला वाटणारा.. तशी ती नाही मात्र. तिचा स्वभाव जरा मानी.. आणि जरा जास्तच ' भाव ' खाणारी.. त्यामुळे ती काही अगदी सर्वांनाच आवडेल अशी नाही.. पण असो..  अस्मादिकांची गट्टी मात्र त्याच्याशीच जास्त..

जरा पुढे नोकरी वगैरे लागल्यावर तो अगदी न चुकता.. रोजच हवा असायचा.. सकाळी.. ऑफिसात.. घरी येताना.. अनेक वेळा भेटायचा..

कधी कामाचं प्रेशर असेल.. किंवा कधी उगाच जरा निवांत वेळ आहे म्हणून.. कधी उगाचच low वाटतंय म्हणून.. तर कधी.. बाहेर छान पाऊस पडतोय म्हणून..  कधी आवडती व्यक्ती अजून जरा वेळ थांबावी म्हणून.. तर कधी मनातलं मोकळेपणाने बोलता यावं म्हणून.. 

कधी सगळेच जमलेत तर तो ही हवाच म्हणून..  

कधी आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य नीट व्हावं म्हणून.. 

कधी मोठ्या मोठ्या चर्चांना गती मिळावी म्हणून.. तर कधी उगाच थोडा ब्रेक म्हणून..

कधी सहज.. तर कधी उत्स्फूर्तपणे.. 

तो बोलावला जायचा.. नी तो ही अगदी तत्परतेने उपस्थित असायचा... 

असं करता करता आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि पुढे व्यसनात कधी झालं कळलंच नाही..

मग तो भेटला नाही की जीव कासावीस व्हायला लागला.. चुकचुकल्या सारखं वाटायला लागलं.. काहीही सुचेनासे व्हायला लागलं.. 

तेव्हा ठरवलं.. आता पुरे.. हे थांबायला हवे.. 

त्याची गोडी हळू हळू कमी करायचं ठरलं.. त्याने त्याचा गोल्डन.. तपकिरी रंग घालवून अगदी काळा कुळकुळीत केला आणि कितीही कडवटपणा आणला तरीही..  तरीही त्याची आवड काही कमी झाली नाही.. 

त्याच्या मैत्रिणीशी ओळख वाढवावी का? असाही विचार आला.. पण त्याच्यापेक्षा तिची मैत्री अधिक toxic असं खूप लोकांकडून ऐकलं.. म्हणून ठरवलं नकोच तो मार्ग.. 

अरे.. थांबा.. थांबा..  काय विचार करताय??

पहा त्याच्या बद्दल बोलताना मी अशी वहावत गेले की त्याच नाव देखील नाही सांगितलं.. 

अहो तो.. "चहा" आणि ती.. "कॉफी"!

टाकू का लगेच.. अर्धा अर्धा कप?


- कल्याणी

०६-१०-२०२५

पहाटे ३:४५

Thursday, 17 October 2024

मधुमालती

अधीर अवखळ 
अन्  उत्सुक किती
कोऱ्या पानी चटकन उतरली..
एकटीच..
मधुमालती..

न संदर्भ काही.. 
न प्रस्तावना ती..
वेली सख्यांना सोडून आली..
मुक्त छंद..
मधुमालती..

सुबक पाकळ्या
नाजूक देठी..
पराग अंतरी जपून आली..
धिटूकली..
मधुमालती..

अधीर कल्पना
शब्द पाकळ्या
भावार्थांचे चे पराग गर्भी..
प्रतिभेच्या देठात उमलली,
कविता की ती..
मधुमालती..?

~ कल्याणी (निकिता)
 रात्री ११:४५, 
१६-१०-२०२४



Friday, 18 June 2021

चित्र कविता - ५



निळ्या पावलांनी माझी,
वाट अडवली जेंव्हा..

गती थांबली थांबली,
जणू धरेचीच तेंव्हा..

भूत भविष्याचीही,
सूत्रे त्याच्याच हातात..

गेले नि:शंक मनी मी,
कृष्ण बाहूंच्या पाशात ..


~* कल्याणी *~
१४/०६/२०२१
१:०० दुपारी

Wednesday, 12 February 2020

चित्र कविता-४

चढणारी रात्र, उतरता प्रकाश; विझत चाललेल्या मेणबत्तीचा..

 पुन्हा तल्लफ लावणारा गंध कपातून,  संपलेल्या कॉफीचा..

आणि मनाचा हट्ट .. डायरीची नेमकी  ' तीच ' पाने वाचण्याचा..

आता रात्र चढत जाणार, मेणबत्त्या विझत जाणार, कॉफीच्या कपांची रांग लागणार..

आणि कुठेतरी पहाटे क्षितिजावर गुलाबी छटा उमटली..
डायरी मधल्या ' त्या ' पानातल्या आठवणींसारखी..
की धांदल उडणार..
रात्रीचा पसारा आवरताना..
 माझी आणि मनाची..

~* कल्याणी *~
१२/२/२०२०
पहाटे १३:२०


Tuesday, 10 December 2019

चित्र कविता -३


तुझ्या कपाळी च्या कुंकवाची धिटाई..
की तुझ्या बटांची नुस्ती अवखळ घाई,
ओठांवर आलेल्या सूहास्याच्या लाटा..
की डोळ्यातील लज्जेच्या पुसटश्या छटा,
चाफेकळी नसिकेची मोहकशी खळी..
की तुझं सौंदर्य खुलवणारी खणाची चोळी,
नक्की कशाची ग जादू करतेस तू सांग ना..
तुला पाहून क्षणातच..
दिग्मुढ होताहेत साऱ्या कल्पना..

 - कल्याणी १०-१२-२०१९ दू. १२:२५

Monday, 21 January 2019

चित्रकविता-२

चल नेऊया ती चंद्रकळी,
संभाळूनिया आज घरी. 
गुंफून टाकू काड्यांमध्ये,
बेमालूम ती नक्षिपरी

सुंदर होईल अपुले घरटे,
कवडसे रांगोळी होतील. 
शीतल सुंदर चांदणं रात्री,
प्रेमाचे क्षणही सजतील.

चमचम करतील लाख चांदण्या,
स्वप्न पिल्लांना दिसतील त्यातून. 
नक्षत्रांची ओढ लागुनी,
सातही गगने जातील लांघुन. 

फुलेल तोवर चंद्र कळीतून,
उजळून अंगण टाकील सारे.. 
सायंकाळी आयुष्याच्या,
दीप दृष्टीला हवाच ना रे!

- कल्याणी
 (२७/६/२०१८ दुपारी ३:४५)

चित्रचारोळी-१



लाट दूर गेलेली, 
उफाळून आली..
विसर्जित सारे, 
पुढे ठेवोनिया गेली..
किनारी उभा मी, 
असा स्तब्ध तेव्हा..
गाज सागराची, 
सांत्वने देत गेली..

~*कल्याणी*~
२०-१-२०१९
पहाटे ३:१५


Wednesday, 27 June 2018

चित्रकविता-१

पसरून बाहू
दिर्घ श्वास अन्,
केश मुक्त ते
डोळे मिटून,
एकरुप तू होऊ पाहशी..
न्हाऊन हिरवे वस्त्र लेउनी,
नीलाकाशी मुक्त सोडल्या,
खग केशांच्या वनराणीशी.
वर्षाघन तव उ:श्वासान्नी,
मोहरुन मग झरझर झरतील..
जल बिंदुंचा शृंगार लेऊनी,
ओलेती तू की वनराणी;
प्रश्न कठिण हा सोडवताना
मंत्रमुग्ध मी अनिमिष नयनी
रूप तुझे हे साठवताना,
कवितेतून तव चित्र रेखतो...

- कल्याणी (२७/६/२०१८ स.११:४५)

Tuesday, 28 November 2017

सत्य कि परीकथा

रामाला बहिण होती, शांता नावाची जिला दशरथाने अंग राज्यात दत्तक दिली होती, का? तर त्याला सांगण्यात आलं होतं कि तिने एका
ऋषीपुत्राची तपस्या भंग करून त्याचाशी विवाह करावा आणि त्याला अयोध्येत आणून दशरथाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ करावा.
आणि हो मंथरा दासी मानाने चांगली होती बर का.. ती या शांतेचं सांभाळ करायची आणि शांते सोबत असं सगळं राजाने केलं त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तिने कट कारस्थाने करून रामायण घडवलं.

सीता हे रावणाची एका ब्राह्मण स्त्री कडून झालेली अनौरस मुलगी होती आणि तीच त्याच्या विनाशाचे कारण बनेल हे कुणीतरी सांगितल्यामुळे तिला टाकून देण्यात आली आणि मग ती शिकारीवर गेलेल्या जनकाला सापडली' आणि जानकी झाली. मग पुढे तोच रावण तिला (आपल्या मुलीला) पळवून घेऊन गेला.

वाचून धक्का बसला ?? मला तरी माहित नव्हते बुवा हे सगळे. अशातच काही पुस्तकांमधून वाचले. गेल्या वर्षात अशी बरीच पुस्तके प्रकाशित झाली आणि माझ्या वाचनात आली. आनंद निलकंठण ची Asura- The tell of Ravana, आमिष त्रिपाठीचे Shiva Trilogy, आणि Rama Trilogy हि काही उदाहरणे. मोठी गम्मत वाटते मला या पुस्तकांची. जे वाईट ते वाईटच.. असे मानून चालणारे आपण.. पण ते का तसे? असे प्रश्न आपल्याला पडतच नाहीत. हि पुस्तके वाचून एक नवाच आयाम मिळतो लहानपणापासून ऐकत आलेल्या रामायण महाभारत आणि अशा अनेक गोष्टींना.

आता खरं सांगायचं तर या पुस्तकांवरती अगदी दोन विरोधी टोकाच्या प्रतिक्रिया मिळतात. काही जणांना हे पटतच नाही कि आपल्या पुराण कथांमधल्या  so called Negative पात्रांची काहीतरी bright side पण असू शकते. तर काही माझ्यासारख्या fantasy loving लोकांना त्या शक्यता अगदी भारावून टाकतात आणि काही ठिकाणी तर अमृत, विष, असुर, देव या सगळ्या आपण कधीही न पाहिलेल्या गोष्टींची खूपच शास्त्रशुद्ध संकल्पना मांडली आहे या पुस्तकांमधून. लेखकाने आपली कल्पनाशक्ती वापर्लीये कि खरच खूप अभ्यास करून सत्यता मांडलीये याचा माग काढण्याची मला तरी गरज वाटत नाही. पूर्वग्रहदुषित न राहता सारासार विचार केला तर पटतात पण या गोष्टी.


असो.. वादात पडण्यापेक्षा मी तरी आपली हे पुस्तके वाचून पटलं तर  truth नाही तर fantasy समजून निखळ वाचनानंद मिळविणे पसंत करते.

-कल्याणी
२८-११-२०१७
रात्री ११.३५

कालचा वीकएंड.


शुक्रवारी माझ्या प्रिय मैत्रीण मेधावी Medhavi Joshi-Bajiraoमुळे आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि माझी १० वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली. वर सोने पे सुहागा असा काय म्हणतात तसं , हा कार्यक्रम पाहायला माझ्या सर्वात जवळच्या अशा ४ व्यक्ती सोबत होत्या. टंकसाळे काकू(मातृ स्वरूप Pratibha Tanksale), नमिता (पिल्लू स्वरूप Namita Kulkarni), मंगेश (साक्षात अहो Mangesh Vazarkar) आणि कविता(माझी जीवश्च कंठश्च सखी Kavita Patil ).
'सांग सख्या रे.. आहे का ती.. अजून .. तैशीच.. गर्द राईपरी '
संदीप खरेंची Sandeep Khare पहिली मी ऐकलेली कविता.. त्याच्या 'तिच्या'साठी लिहिलेल्या 'ति'च्या (कविताच नक्की) प्रेमात मी पडले आणि मग त्याचा असंख्य त्या (पुन्हा कविताच..)माझ्या मैत्रिणी होत गेल्या.
सरळ, सहज शब्दात सुरु होणार आशय .. लगेच लक्षात राहील अशी शब्दरचना .. अरे कित्ती सोपा आहे अशी कविता लिहिणं असा वाटत असतानाच शेवटच्या काही ओळींमधून कधी जीवघेणा वास्तव, तर कधी हृदय पिळवटून टाकणारी वेदना समोर येते आणि आपण विस्मयचकित होऊन त्या शब्दांच्या मोहिनी मध्ये असे खेचले जातो कि भानच राहत नाही कि आपण कविताच ऐकत होतो.
कधी आपलीच कुठलीतरी मनाच्या खोल खोल तळाशी कोंडून ठेवलेली दुखरी आठवण समोर आणावी , तर कधी गोड गुलाबी क्षणांच्या राज्यात फिरवून आणावं, कधी पडद्याआड दडलेल्या वास्तवाचं दर्शन अगदी नेमकेपणाने घडावं तर कधी रोजच्या रहाटगाड्यात निवांत क्षण देऊन थकल्या भागल्या मनाला सुखवावं अशी अनोखी कविता फक्त संदीप खरेच लिहू शकतात.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात Yashwantrao Chavan Natyagruha 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही' #ChalaDostahoAyushyavarBoluKahi चा सुरांसोबत जेव्हा पडदा हळू हळू सरकत गेला तेव्हाच आपण एका अनोख्या जगाची सफर करणार आहोत असा आभास निर्माण झाला. त्यानंतर शब्द, सूर, हास्यविनोद, टाळ्या, शिट्ट्या फर्माइशींची अशी जोरदार बरसात होत गेली. कुणी म्हणताय 'जा दिले मन तुला' .. तर कुणी म्हणताय 'नामंजूर '.. कुणाला 'मोर्चा ' हवाय तर कुणाला 'लव्ह लेटर '. फर्माइशींची अशी जुगलबंदी जमत गेली कि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखत नसू कदाचित.. पण अवघडलेपणा राहिलाच नाही कुठे.. आपल्याच यार दोस्तांसोबत गप्पांचा फड रंगवलाय असा वातावरण तयार झालं.. खरंच इतकी जादू आहे संदीप खरेंच्या कवितांमध्ये आणि सलील कुलकर्णींच्या Saleel Kulkarni Official सुरांमध्ये कि त्या शुक्रवारच्या संध्याकाळनंतर आलेली शनिवार आणि रविवार ची सुट्टीपण त्या कवितांच्या ओळी गुणगुणत वेगळ्याच आनंदलहरींनी भारून राहिली.

- कल्याणी
२७-११-२०१७
सायंकाळी ६:३० 

Friday, 3 March 2017

कुतूहल

कुतूहलाचे मज कुतूहल वाटे
किती निरागस भाव हा असे
काय कधी अन् कशास केव्हा
प्रश्नांतुनी हा जन्म घेतसे

कुतूहलाला बंध नसे
वेळ वय वा विषयाचा
होईल वेडा क्षणांत कुणीही
मित्र होई जो कुतूहलाचा

विस्मयकारक अनुभव मिळतो
पाठवुरावा याचा करिता
गरज जननी जर शोधाची
कुतूहल असे त्याचा पिता

उतू नका मातू नका
टाकू नका वसा याचा
याचीच कास धरून शेवटी
प्रत्येक प्रश्न सोडवायचा

-कल्याणी
२ मार्च २०१७
सायं ७:१५

Sunday, 20 November 2016

हट्टं

आज मुरली रे कान्हा 
वाजवायची नाही (ना! हि) तू 
स्वरमोहिनी रे मला 
घालायची नाही (ना! हि) तू 

घट जीवनाचे कान्हा 
अर्पियले लाटांवरी 
जेंव्हा गर्द राई तुनी 
साद तिची ऐकियेली

मोह मायेची हि वस्त्रे
वाऱ्यावरी उडो गेली 
स्वर लहरींनी जेंव्हा 
गात्र गात्र जागविली 

जीव किती दमविला 
तुला शोधता शोधता
व्यर्थ खटाटोप केला
सूर अंतरीच होता 

हात धरियेला तुझा 
आता नेई सोबती तू 
स्वरमोहिनी रे आज
घालायची नाही (ना! हि) तू 

-कल्याणी 
१२:४० पहाटे  २०/११/२०१६

Wednesday, 30 December 2015

वाह!

प्रभात समयी रवि किरणांनी
खुशाल चादर ओढून न्यावी
गर्द काजळी निशिरंगांची
सुप्त झोपल्या धरणी वरुनी ।

निळी निळाई उजळूनी यावी
क्षितीजावरी चांदी पसरावी
पुन्हा पाखरे घेत भरारी
सांतही गगना पल्याड जावी ।

तसेच काही होते रसिका ,
"वाह!" तुझी जेव्हा बघ येते
सुप्त झोपल्या प्रतिभेची मग
जणू चमचमती प्रभात होते ।

- कल्याणी कुलकर्णी
११:०६ सकाळी
३० / १२ / २०१५ 

Tuesday, 9 June 2015

विरह



मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार
माझ्या आठवणीत साऱ्या जगाला विसरत असणार

ते तळ, जिथे आपण भेटायचो
ते झाड, ज्याच्या सावलीत तासनतास बसायचो
आपल्या भेटीची साक्ष देत, अजूनही तिथेच असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

तू वेडापिसा झालास कि, ते झाडही थरथरत
तुला सहानुभूती म्हणून, अस्वस्थपणे सळसळत
माझ्या येण्याची वाट, ते हि नक्कीच पाहत असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

फुलपाखरे पाहून तुला, माझे डोळे आठवतात
वार्याच्या झुळूकेत तुला, माझ्या हसण्याचे भास होतात
तुझ्या हाताला माझ्या तळव्याचे, स्पर्श नक्कीच जाणवत असणार
मला  माहितीये तू नक्कीच झुरत असणार

~~* कल्याणी *~~

Wednesday, 6 August 2014

अनामिका


माझ्याच कवितेला मीच त्रयस्थपणे पाहिल्यानंतर सुचलेले हे विचार..
शीर्षक काय देऊ? कविता? कल्पना? की प्रतिभा?
---------------------------------------------------------------------------------------
शब्द शब्द गुंफूनी
हे काव्य कैसे प्रसवले?
भाव माझे शब्द तुझे
एक कैसे जाहले?

 
स्पंदने माझ्या मनाची
तू कशी ग जाणीली?
हाक माझ्या अंतरीची
तू कशी हुंकारीली?

तू सखी तू..?
तू परी तू..?
की भुलवी मजला आसरा..!

तू खरी तू..?
वसशी कुठे तू...?
की फक्त माझी कल्पना..!

-कल्याणी (निकिता)

ओढ

जवळपास एका वर्षानंतर काहीतरी लिहिलंय. जरा  अपक्व वाटेल पण गोड मानून घ्या.
कविता बहिणाबाईंच्या "मन वढाय वढाय" च्या धाटणी ची आहे. ओवी प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. चुका असतील तर नक्की दाखवा .
------------------------------------------------------------------------------------------------------

मन बेभान बेभान , उगा विचलित होई ।
सातासमुद्रापल्याड, दूर देशामध्ये जाई ।।

अरे थांब रे रे मना , नको जाऊ असा दूर ।
डोळ्यातून बरसेल, पाऊस तो झरझर ।।

कशी आवरू रे त्याला, किती विनवणी केली ।
दूर देशी रे साजन , मना ओढ ती लागली ।। 

- कल्याणी
०५-०८-२०१४
पहाटे १:१५

Monday, 4 August 2014

यादे

तेरी याद मे सुबेह शाम पिता हू..
गम के प्यालो को मय के घुंट समझ कर..
गर्दीश मे चढता है मुझे नशा तेरी यादोंका...
जिता हू उसिमे ख्वाबोकी दुनिया बनाकर..

Tuesday, 1 January 2013

शेकरा.

झुपकेदार  शेपूट, गुंजेसारखे  लाल डोळे अन रामाची बोटे मिरवणारी खारुताई .. कुठेही दिसली तरी लक्ष वेधून घेणारी..

त्याच जातीतली मोठी, रानात राहणारी खार म्हणजे शेकरा. 
या  शेकाऱ्याचा थाट  पण कुणा राजापेक्षा कमी नसतो बरं का .. रानभर हिंडा, दिसेल ते फळ खा किंवा नुसते चाखून टाकून  द्या ..
हवे तिथे घरटे बनवा .. वाटेल तिथे राहा.. अशी उनाड जीवनशैली .. 
आणि विशेष म्हणजे ..अंगच्या चपळतेमुळे फारशी कुणाची भीती नाही म्हणून अंगी शिरलेली मस्ती .. असा हा शेकरा.

विशिष्ठ असा इशारा देऊन लहान सहान प्राण्यांना मोठ्या श्वापदांपासून वाचवणारा .. तर कधी उगाचच गोन्धळात टाकणारा .
पण काहीही झाले तरी राहत्या वनाशी, पोसणाऱ्या मातीशी सदैव इमानी असलेला. शेवटपर्यंत रानाची सोबत करणारा.

विलक्षण अशा कथा आहेत रणजीत देसाई यांच्या 'शेकरा ' कथावलीत.
या अति चंचल वल्ली शेकाऱ्याच्या मनात शिरून अगदी नेटकेपणे मांडलेल्या..

~~* कल्याणी *~~

Sunday, 23 December 2012

"आठवणी चं गो च्या "


मैत्रिणीसोबत झालेलं छोट्टस भांडण, गणिताची वर्ग परीक्षा किंवा उगाचच आवडणारा "तो" वर्गात उपस्थित नसणं या तीनही गोष्टी सारख्याच वेदनादायक असतात त्या काळात म्हणजे so called "teenage " मध्ये मला चं गो भेटले,
अर्थात "मी माझा" मधून. आणि हा मोहक खळी असलेला, घाऱ्या बोलक्या डोळ्यांनीच घायाळ करणारा कवी हाच माझा "first crush" हे मी declare करून मोकळी झाले.

त्या वेळी त्या चारोळ्यांचा अर्थ असा कितीसा कळायचा देव जाणे, पण "मी माझा", आणि "पुन्हा मी माझा" वाचणे हा माझा केवळ छंद न राहता गरज झाली. कदाचित तेव्हाच्या बाळबोध अस्मादिकांनी त्या चारोळ्यांचे काहीसे बाळबोध अर्थच लावले असतील.
पण कारण काहीही असो जरा "mood off " झाला कि हि झिपरी पोर हि पुस्तके घेऊन जिन्यात धुसमुसत बसायची.
उन्हाळ्यात माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीसोबत आख्खी दुपारभर "मी माझा" आणि "पुन्हा मी माझा" ची पारायणं झाली आणि आम्ही चं गो ची भाषा बोलायला लागलो.


"गप्पच रहावसं वाटतं
तुझ्या जवळ बसल्यावर
वाटतं तूच सगळं ओळखावस
मी नुसतं हसल्यावर "

हि चारोळी ३ तास गप्पा मारून झाल्यावर आम्ही एकमेकीना dedicate केल्याचं पण आठवतंय.

नंतर हळू हळू एकएक चारोळीचा  अर्थ समजत उमजत गेला  आणि तेव्हाच्या "just crush " च्या चारोळ्यांच्या मी प्रेमात पडले.

"चिंब भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं " या चारोळ्या वाचल्यावर..
पहा मी अजूनही तीच भाषा बोलतीये... 

"ते" म्हणतात असं ,
"मनाची तहान
पाण्याने भागात नाही,
ते बरं आहे की सगळ्यांनाच,
मनाची तहान लागत नाही "

त्या काही लोकांना हि तहान भागवणारा अमृतकलश सापडलाय हे कुठे ठावूक आहे "चं गो" ना  :)

- कल्याणी (निकिता कुलकर्णी)

पहाटे १.१९
२३-१२-२०१२