Sunday 23 December 2012

"आठवणी चं गो च्या "


मैत्रिणीसोबत झालेलं छोट्टस भांडण, गणिताची वर्ग परीक्षा किंवा उगाचच आवडणारा "तो" वर्गात उपस्थित नसणं या तीनही गोष्टी सारख्याच वेदनादायक असतात त्या काळात म्हणजे so called "teenage " मध्ये मला चं गो भेटले,
अर्थात "मी माझा" मधून. आणि हा मोहक खळी असलेला, घाऱ्या बोलक्या डोळ्यांनीच घायाळ करणारा कवी हाच माझा "first crush" हे मी declare करून मोकळी झाले.

त्या वेळी त्या चारोळ्यांचा अर्थ असा कितीसा कळायचा देव जाणे, पण "मी माझा", आणि "पुन्हा मी माझा" वाचणे हा माझा केवळ छंद न राहता गरज झाली. कदाचित तेव्हाच्या बाळबोध अस्मादिकांनी त्या चारोळ्यांचे काहीसे बाळबोध अर्थच लावले असतील.
पण कारण काहीही असो जरा "mood off " झाला कि हि झिपरी पोर हि पुस्तके घेऊन जिन्यात धुसमुसत बसायची.
उन्हाळ्यात माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीसोबत आख्खी दुपारभर "मी माझा" आणि "पुन्हा मी माझा" ची पारायणं झाली आणि आम्ही चं गो ची भाषा बोलायला लागलो.


"गप्पच रहावसं वाटतं
तुझ्या जवळ बसल्यावर
वाटतं तूच सगळं ओळखावस
मी नुसतं हसल्यावर "

हि चारोळी ३ तास गप्पा मारून झाल्यावर आम्ही एकमेकीना dedicate केल्याचं पण आठवतंय.

नंतर हळू हळू एकएक चारोळीचा  अर्थ समजत उमजत गेला  आणि तेव्हाच्या "just crush " च्या चारोळ्यांच्या मी प्रेमात पडले.

"चिंब भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं " या चारोळ्या वाचल्यावर..
पहा मी अजूनही तीच भाषा बोलतीये... 

"ते" म्हणतात असं ,
"मनाची तहान
पाण्याने भागात नाही,
ते बरं आहे की सगळ्यांनाच,
मनाची तहान लागत नाही "

त्या काही लोकांना हि तहान भागवणारा अमृतकलश सापडलाय हे कुठे ठावूक आहे "चं गो" ना  :)

- कल्याणी (निकिता कुलकर्णी)

पहाटे १.१९
२३-१२-२०१२

Wednesday 5 December 2012

निरोप ..


पापण्यांच्या पाकळ्यांवर जमलेले दव
ओघळत राहिले हळुवार ..
कित्येकदा, त्या वेळी ..

दाटलेल्या कंठात शब्दांची  गर्दी
अडखळली  वाक्ये
कित्येकदा त्या वेळी ..

थरथरत्या मनात, भावनांचा प्रपात
लपवले कंपित हात,
कित्येकदा त्या वेळी..

अखेरची नाही भेट, जुळतील वाटा पुन्हा
समजावले मनाला,
कित्येकदा त्या वेळी..

चिडलो, रडलो, हसलोही जरा खिन्नपणे,
नेमका निरोपच घ्यायचा राहिला ..
अखेरचा .. त्या वेळी ..

-कल्याणी
पहाटे १:४५
05/12/2012


टिप : 'Life of Pi' चित्रपटातील एका प्रसंगाने प्रेरित !

Tuesday 13 November 2012

दिवाळी

दिवाळीचा दिवा अंगणी लागावा..
प्रकाशाने त्याच्या आसमंत उजळावा..

समृद्धीचे तेज परसदारी जावे..
लक्ष्मिचे पैंजण दारोदारी वाजावे..

वरदहस्त राहो धन्वंतरीचा
नरकासुर जळो अज्ञानाचा..

अशी व्हावी दिवाळी सान थोर सर्वांची
स्वल्प हि प्रार्थना देवा कल्याणीची ..


~~** कल्याणी **~~

Friday 12 October 2012

अपूर्णता


असं नेहेमीच वाटतं, 
कि क्षितीज मला खुणावतंय..
कवेत घ्यायला उत्सुक 
बाहू पसरून हसतंय..

मीही घेऊ बघते झेप.
पण पोचत नाही तिथवर..

माझी झेप अपुरी,
कि हे फक्त मृगजळ ..?
भासमान मूर्ती सारखं
दूर दूर पळतंय..

पण असं नेहेमीच वाटतं 
कि क्षितीज मला खुणावतंय ..

~~* कल्याणी *~~

Tuesday 11 September 2012

मेख मोगरी

" मेख मोगरी " नावंच खूप आकर्षक वाटलं..!

कुठे तरी भिंतीवर किंवा दारावर ठोकलेली मेख जिचा आणि सौंदर्याचा दूर दूर वर काही संबंध नाही अशी ,
अन टप्पोऱ्या मोत्यांची चकाकणारी, लक्षवेधी, मनास भुरळ पडणारी, कुणा वीराच्या भरजरी पोशाखावर किंवा ललनेच्या शृंगारात सजणारी मोगरी..


  मेख तशी असते कठीण दिसायला ती ठोकली कुठे तर खोलवर जाणारी,
अन जर काढली बाहेर तर कधीही भरून न निघणारी फट  मागे सोडून जाणारी .
 

उलट मोगरी नुसतीच सजवण्याच्या, नटण्याच्या कामाची. पण असेल तिथे लक्ष वेधून घेणारी, किंवा साज शृंगारात हटकून आपला वेगळा स्थान निर्माण करणारी.


यातल्या  व्यक्ती पण अशाच आहेत, कुणी मेखेप्रमाणे कठीण कडक पण मनावर छाप सोडून जाणाऱ्या
अन कुणी उगाच मोगरीसारखी, हटकून स्वतःची जागा निर्माण करणाऱ्या, कथेतल्या मुख्य
पात्रासोबत त्यांचा पण विचार करायला लावणाऱ्या..

आता या अशा दोन भिन्न प्रकारच्या व्यक्ती कशा कुठे एका कथेत गुंफल्या जातात, मेख आणि मोगरीचा  संगम कसा आणि कुठे बरे होतो..
 ते मात्र मी सांगणार नाही हं मुळीच, त्यासाठी मात्र रणजित देसाईच  हे पुस्तकच वाचायला हवं.

~~* कल्याणी *~~




Sunday 2 September 2012

मधुमती


"रुपमहाल" नंतर थांबावस वाटत नव्हतं म्हणून "मधुमती" हि वाचायला घेतला आणि एका वेगळ्याच जगात प्रवास करून आल्याचा आनंद पुन्हा अनुभवला.
म्हणून हा लेखनप्रपंच.

मधुमती 


सौन्दर्य अन जोडीला खानदानी गायकीची परंपरा जपणाऱ्या, मधुर गळा आणि मदिरा यांची अधिराणी समजल्या जाणाऱ्या नायकीनिंच्या वेगवेगळ्या ढंगात रंगात नटलेली रणजित देसाईंची "मधुमती"..

    नायकीनि या केवळ  शौकीन लोकांना मोहित करून त्यंच्या पैशांवर ताबा मिळवून छान-छोकीत राहणाऱ्या किंवा एक तर रंगेल किंवा कलासक्त राजाच्या दरबारी "सेवेस"  स्त्रिया असतात हा जनापवाद स्पष्टपणे खोडून काढणारी हि कथावली. 
एवढ्या नजाकतीने प्रत्येक कथेतली सौन्दर्यवती वर्णिली गेली आहे कि वाचता वाचता ती साक्षात पुढे उभी असल्याचा भास होतो.
या शृंगारिक वर्णनासोबतच यातल्या प्रत्येक कथेला एका वेगळ्याच नाट्याची झालर आहे. 
कधी कुणा वारांगानेला पित्याच्या प्रेमाची झलक दाखवून जाणारा कुणी प्रवासी भेटतो, कधी कुणा "स्त्री हे केवळ उपभोगाचे साधन" असे मानणाऱ्या गर्भश्रीमंत दलालाचे स्त्रीत्वाच्या तेजस्वी सात्त्विकतेचे दर्शन देऊन डोळे उघडणारी कुणी युवती भेटते.
शेवटी लेखकाच्याच भाषेत सांगावस वाटत..
"समेवर येता येता प्रत्येक कथा वाचकाची 'हो' मिळवूनच थांबते."

~~* कल्याणी *~~

Saturday 25 August 2012

रुपमहाल


आत्ताच एक छानसं लघु कथांच पुस्तक वाचून संपवलं.. त्याच रसग्रहण म्हणा किवा संक्षेपात केलेलं अवलोकन म्हणा .. माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात जुळवा जुळव करून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
ते वाचून जर पुस्तक वाचण्याची कुणाला इच्छा झाली तर माझ्या भा पो झाल्या अस समजेन.. :)

रुपमहाल

कधी टाळ्या, चित्कार, शिट्या अन चै अगद चै च्या हाके ला  'ओ' देत चिडलेल्या, त्रस्त झालेल्या, मद मस्त झालेल्या साठेमारीच्या हत्तीच्या पायी असो, 

तर कधी माळवाच्या कडावर रणरणत्या उन्हात एका प्रेमळ पण कर्तव्यनिष्ठ, कुलाची अस्मिता जपण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या बापाच्याच हाताने असो ..

किंवा कधी दुर्दैवाने दरोडेखोर ठरवलेल्या गेलेल्या क्रांतिकारी प्रियकराच्या मिठीत शिरून केवळ दिलेल्या शब्दाला जगण्यासाठी म्हणून आनंदाने बंदुकीच्या गोळ्या झेलून असो..   

तर कधी, ज्या हातांनी  झोकात शिकार करायला  शिकवली, लळा लावला,  शाबासकी दिली त्याच हातानी विष चारून अन नंतर स्वतःला संपवून असो ..

कधी मान मराताबाची, पैशाची झिंग चढलेल्या पाटलाने दिलेल्या धोक्यामुळे झालेल्या अपघाताने कुस्तीत आजारी प्रतिस्पर्ध्याच्या बरगड्या मोडल्याने असो..

वा कधी जिथे उत्कटतेने  स्वराराधना , प्रणय आराधना केली  अन तितक्याच असीम भक्तिभावाने नर्मदेला रोजचा प्रणिपात केला 
त्याच  बुरुजावर प्रियकराच्या विरहात गळी हिरकणी उतरवून असो..

अनेक रूपे पण ... शेवट एकच... मृत्यू ... आणि .. आणि .. त्या नंतर वाचकाला लागून राहिलेली अस्वस्थता हुरहूर पण त्याच बरोबर .. एक अत्युच्च प्रतिभेने ओतप्रोत भरलेली साहित्यकृती वाचल्याचे समाधान..
म्हणजे .. रणजित  देसाईचा "रुपमहाल"!  

~~* कल्याणी *~~

Sunday 12 August 2012

उलथा-पालथ



माझ्या भिंती माझंच घर 
माझं प्रेम माझेच जन 
माझी जखम मझाच सल
माझ्या माझ्यात घुसमटणारं 
माझंच मन.. माझंच मन..

माझं सुख माझं विश्व
नको कुणाची ओंगळ सोबत 
मी एकला माझंच सर्वस्व 
मी पणाला मिरवणारं
माझंच मन.. माझंच मन..

एक क्षण मग अवचित येतो
माझ्या विश्वात वादळ होऊन 
अहं पणाच्या भिंती तोडून 
लाचार होतं मग ..
माझंच मन.. माझंच मन.. !
- कल्याणी 

Saturday 3 March 2012

लेखणी

कवितेच्या शब्दांनी एकदा,
मनाची चोरी केली..
जपून ठेवलेली एक भावना,
कागदावर आणून ठेवली..
लेखणी मात्र हुशार होती,
तिने लगेच ती खोडली..
मनाची एक चोरी अशी,
मनातच दडून राहिली ..!

Tuesday 21 February 2012

मैत्री

(या कवितेसाठी मला प्रस्तावनेची गरज वाटत नाही .. शीर्षकातच सारं काही समजतं, उमजतं...!!)
 
अनेकरंगी छटा घेऊन नटलेली रोजचीच पहाट
जशी रोजच वेगळी वाटते
तशी नवलाई तुझ्या माझ्या मैत्रीची..!

दरवेळी नव्या विश्वात सैर करवणाऱ्या
मदिरेच्या व्यसनासारखी..
पण..
आभाळभर स्वैर भिरभिरला तरी
जमिनीशी बांधून ठेवणाऱ्या
पतंगाच्या दोरीसारखी..!

तर कधी ,
कितीही कुरकुर केली तरी
संध्याकाळी परतीची वाट पाहणाऱ्या
प्रेमळ आश्वासक अशा
जुन्या कडेकोट दारासारखी..!

उमलत्या पाकळ्याप्रमाणे  उलगडत गेली आपली सोबत..
प्रत्येक पाकळीसोबत गहिरत गेले आपल्या मैत्रीचे रंग,
अन आता.. आयुष्यभर दरवळेल अशा
आठवणीच्या परीमलाने भरून राहिलाय..
तुझा माझा आसमंत....!!

-- कल्याणी


Monday 23 January 2012

आठवण

आठवणींच्या गावात जेव्हा जेव्हा जाईन मी
तुझ्या दारी क्षणभर तरी पावले माझी थांबतील... !

जाता जाता वेचीन फुले .. तुझ्या अंगणातल्या प्राजक्ताची...,
वाट माझी सुगंधी तीच फुले करतील..!

- कल्याणी
 

Tuesday 17 January 2012

संधिकाल


तो वट-वृक्ष उभा दूर टेकडीवरचा..
मंदिराच्या कळसावर अखंड छत्रचामरं ढाळीत,
त्याच्या पानांचा संततधार अभिषेक
अगम्य अशा सळसळीत
अखंड चालू त्याची ध्यानधारणा...!

कालच्याच पावसात निखळून पडलेली
अजून एक जुनी फांदी,
तरीही त्याची तटस्थता..
जितेंद्रिय योग्याचाच हा  बाणा..!

उगवत्या दिशाभिमुख होऊन
मावळतीची वाट पाहणारा..
आयुष्याचा संधिकाल
समाधानाने अनुभवणारा..!!

- कल्याणी

Wednesday 11 January 2012

Drishti


पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहात एक आंधळी मुलगी मला दिसली होती..
तिला वेडीला कुठे दिसणार होता विठोबा...
पण त्यांच्या सोबत.. तितक्याच उत्साहाने तीही विठू नामाचा गजर करत जात होती..
काय चालू असेल बर तिच्या मनात..?
ते तिचे विचार माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय..

"दृष्टी"

त्याच्या डोळ्यात पाहताना म्हणे,
साऱ्या यातना विसरतात,
स्वर्गसुखाचा भास होऊन
पंचेंद्रिये सुखावतात ..

अष्टसात्विक भाव म्हणे
तेव्हा सारे अनुभवतात..
दिवस रात्र काळ वेळ
सारे काही स्थिरावतात

मलाही हा अनुभव
एकदा नक्की घ्यायचाय
पंढरीचा विठोबा
डोळे भरून पाहायचाय..

पंचप्राण वाहीन माझे
त्या दात्याच्या चरणावर..
दिली जर मला दृष्टी कुणी
फक्त एकाच क्षणभर..


-कल्याणी